लासलगाव महावितरणचा भोंगळ कारभार… ग्रामस्थ त्रस्त, अधिकारी, कर्मचारी निर्धास्त…
अर्धा तास पाऊस आणि दहा तास वीज गायब

महेश साळुंखे – मुख्य संपादक
ऊन, वारा,पाऊस या तिन्ही ऋतूमध्ये जीवाची बाजी लावून काम करणारे अनेक प्रामाणिक कर्मचारी देखील आहेत, परंतु काही कर्मचारी अपवाद असल्यामुळे गव्हासोबत किडे रगडतात, या म्हणीचा प्रत्यय सध्या लासलगाव महावितरण मध्ये दिसत आहे.
या बाबत वरीष्ठ अधिकारी वर्गाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, तसेच सहाय्यक अभियंता व कर्मचा-र्यांनी ग्रामस्थ व ग्राहकांना सौजन्याची वागणूक दिली पाहिजे असे कडक आदेश देऊन पुन्हा त्या अधिकारी, कर्मचारी यांच्या बाबत तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी होत आहे.
लासलगाव-: महावितरण कंपनीचे लासलगाव शहरी कार्यालयाच्या भोंगळ कारभाराने ग्रामस्थ व वीज कंपनीचे ग्राहक यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. कर्मचारी उपलब्ध नसणे, अवेळी जाणारी वीज व फोन न घेणारे कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या अर्वाच्य बोलण्यामुळे ग्रामस्थांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत असून, हा त्रास न थांबल्यास लासलगाव शहर कार्यालयातील अधिकाऱ्यावर ग्रामस्थ मोठा रोष व्यक्त करू शकता अशी माहिती सूत्रांकडून समजते.
लासलगाव महावितरण शहर कार्यालयातील सहाय्यक अभियंता मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही, शहरी विभागा मार्फत पावसाळी पूर्व कामे करून मोठे बिल काढले जाते तरीही पाच मिनिटे पाऊस आला असता दोन दोन तास वीज गायब होते याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे,रात्री-अपरात्री वीज गेल्यावर महावितरणचा जुन्या संपर्क क्रमांकावर फोन लागत नाही. वीज खंडित झाल्याच्या तक्रारीबाबत अधिकाऱ्यास फोन केला असता ऑनलाइन तक्रार दाखल करा असे सांगितले जाते वीज येईल की नाही याची माहिती देखील ग्रामस्थांना दिली जात नाही. थोडा पाऊस झाला तरी वीज जाणे नित्याचे झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून, बोलावे तरी कुणाला, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
रात्रीच्या वेळी कर्मचारी ,फोन न घेणे, अरेरावीची भाषा वापरणे,वीजबिल रिकव्हारी वेळी अर्वाच्य भाषेचा वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. नोकरीच्या ठिकाणी शहरी अभियंत्यासह कर्मचारी वास्तव्यास नसल्याची बाब निदर्शनास आलीआहे. त्यामुळे अनेकदा ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब ग्रामस्थांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली तरी देखील वरिष्ठ अधिकारी यांचेकडून काही ठराविक कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याची चर्चा शहरात होत आहे.