लग्नसराई व शाळांच्या सुट्ट्यांमुळे बाहेर गावी जाताय…. सावधान….. लासलगाव पोलिसांचा सावधानतेचा इशारा

मुख्य संपादक -महेश साळुंके
लासलगाव:- सध्या लग्नसराई व शाळांच्या सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबे बाहेरगावी जात आहेत. परिणामी घरे अनेक दिवस कुलूपबंद असतात. याचा फायदा घेत परिसरात भुरट्या चोरांची टोळी सक्रिय झाली असून, बंद घरे त्यांच्या निशाण्यावर आहेत. यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसण्याच्या घटना घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि भास्करराव शिंदे यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, घर बंद करताना मौल्यवान वस्तू व रोकड घरात ठेवू नये. तसेच बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना कल्पना द्यावी. आपल्या परिसरात अनोळखी व्यक्ती, घरोघरी फिरणारे भटके किंवा विक्रेते आढळल्यास त्यांच्यावर संशयाने लक्ष ठेवावे. ते घरांची रेकी करत असल्याची शक्यता असते. अशा व्यक्तींना कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. विशेषतः पासपोर्ट साईज फोटो, आधार माहिती किंवा जन्मतारखेसारखी कागदपत्रे देणे टाळावे. काही व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तात्काळ गावचे पोलीस पाटील किंवा लासलगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
“सध्या लग्नसराई आणि शाळा सुट्ट्यांमुळे अनेक घरे कुलूपबंद असतात. याचा फायदा घेऊन भुरट्या चोर सक्रिय झाले आहेत. नागरिकांनी घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, तसेच अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवून सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.”
– स.पो.नि भास्करराव शिंदे,
लासलगाव पोलीस ठाणे